सोनखेडीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, अमळनेर एम.आय.डी.सी.मध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात फेरफार आणि व्यापाऱ्यांकडून दादागिरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी यापुढे असे प्रकार घडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत, "आता गाठ शेतकरी राजाशी आहे!" असे ठणकावले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सोनखेडी येथील घटनेचे पडसाद अजून ताजे असतानाच, अमळनेर एम.आय.डी.सी. परिसरात शेतकऱ्यांच्या मालाच्या मोजमापात फेरफार आणि व्यापाऱ्यांच्या मुजोरीचा एक धक्कादायक प्रकार 'लोकमन न्यूज' समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
धार (ता. माळपूर) येथील शेतकरी यशवंत शंकर पवार यांनी १० मार्च २०२६ रोजी आपला मेहनतीने पिकवलेला गहू विक्रीसाठी अमळनेर बाजार समितीतील 'गुरुदत्त ट्रेडर्स' या आडत्याकडे आणला होता. हा माल 'योगेश ब्रदर्स' या खरेदीदाराने विकत घेतला. मात्र, इथेच शेतकऱ्यांच्या लुटीची सुरुवात झाली. मोजमापासाठी हा माल बाजार समितीच्या परिसरात न मोजता, चक्क ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'आर. के. फ्लोअर मिल' मध्ये पाठवण्यात आला.
जेव्हा या मालाचे मोजमाप फ्लोअर मिलमध्ये झाले, तेव्हा वजनात मोठी तफावत असल्याचे यशवंत पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत जाब विचारला असता, मिलमधील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बोलू न देता चक्क दादागिरीची भाषा वापरली. या प्रकारामुळे पवार यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला.
📌 शेतकऱ्यांचे गंभीर आरोप आणि प्रमुख मागण्या:
- मोजमापातील संशय: माल मोजण्यासाठी बाजार समितीच्या आवाराबाहेर, ४-५ किमी दूर पाठवण्यामागे वजनात फेरफार करण्याचा उद्देश आहे का, असा गंभीर संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- वाहतूक खर्चाचा भुर्दंड: बाजार समिती बाहेर माल नेल्यामुळे होणारा अतिरिक्त वाहतूक खर्च संबंधित व्यापाऱ्यांनीच भरपाई म्हणून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
- धान्याची नासधूस थांबवा: माल घेताना ५-६ किलो धान्य जाणूनबुजून जमिनीवर फेकून दिली जाणारी 'धळ' (नासधूस) तातडीने थांबवावी.
- पिण्याच्या पाण्याची सोय: बाजार समिती आणि एम.आय.डी.सी. परिसरात शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची साधी सोयही नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कठोर कारवाईचा इशारा, अन्यथा तीव्र आंदोलन!
"आम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची अशी लूट किंवा गैरव्यवहार कदापि सहन करणार नाही," असे संतप्त यशवंत पवार आणि इतर शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यांनी अमळनेर बाजार समितीचे चेअरमन आणि संचालक मंडळाला या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "अन्यथा, जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल," असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी: अनिल चौधरी, लोकमन न्यूज, निंब (अमळनेर)



