महाराष्ट्र
लोकमन न्यूज़ अनिल चौधरी मुंबई. राज्यात वीज अपघातांचे प्रमाण पूर्णतः शून्यावर आणण्याच्या उद्देशाने महावितरणने कर्मचारी सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. ‘शून्य वीज अपघात’ हेच अंतिम ध्येय ठेवत, आता प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या कार्यदिवशी कामाची सुरुवात ‘वीज सुरक्षा शपथ’ घेऊन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे कर्मचारी मानसिकतेत वीज सुरक्षेबाबत जागरूकता वाढेल, काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याची सवय लागेल आणि अपघात टाळण्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार, वीज क्षेत्रातील काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने कोणतीही तडजोड न करता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ उपकरणे किंवा तंत्रज्ञान नव्हे, तर कर्मचाऱ्यांची सुरक्षित मानसिकता आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती हीच अपघात रोखण्याची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘वीज सुरक्षा शपथ’ उपक्रमामुळे कर्मचारी स्वतःच्या तसेच सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशील होतील. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे यांसारख्या सुरक्षासाधनांचा वापर, नियमांचे पालन आणि जोखीम ओळखण्याची क्षमता वाढण्यास या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.
महावितरणचा हा नवा कानमंत्र केवळ आदेशापुरता मर्यादित न राहता, ‘सुरक्षित काम — सुरक्षित जीवन’ या संस्कृतीला बळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

शून्य वीज अपघात’ हेच ध्येय; महावितरणचा नवा कर्मचारी कानमंत्र
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १३/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
