उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यात सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन विभाग आणि सर्पमित्रांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(लोकमन न्यूज़ अनिल चौधरी निंब )अमळनेर/जळगाव: उन्हाळा सुरू झाला की, कडक उन्हामुळे केवळ माणसेच नव्हे तर प्राणीही हैराण होतात. अशा वातावरणात जळगाव जिल्ह्यात सापांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नागरिक पहाटे किंवा संध्याकाळी घराबाहेर पडत असताना घात-अपघात घडण्याची शक्यता वाढली असून, वन विभाग आणि सर्पमित्रांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ही माहिती लोकमन न्यूजचे अनिल चौधरी, निंब, अमळनेर यांनी दिली आहे.
उन्हाळ्यात साप बाहेर का येतात? (शास्त्रीय कारणे)
- तापमान नियंत्रण: साप हे 'शीत रक्ताचे' (Cold-blooded) प्राणी आहेत. ते स्वतःच्या शरीराचे तापमान वातावरणाशी जुळवून घेतात. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे त्यांना थंडावा आणि दमट जागेच्या शोधासाठी बाहेर पडावे लागते.
- प्रजनन काळ: उन्हाळा हा प्रामुख्याने नाग आणि धामण यांसारख्या सापांचा प्रजननाचा (मिलनाचा) काळ असतो. या काळात ते जोडीदाराच्या शोधात इतर वेळेपेक्षा जास्त अंतर कापतात, त्यामुळे ते मानवी वस्तीत अधिक दिसतात.
- भक्ष्याचा शोध: वाढत्या उष्णतेमुळे नैसर्गिक अधिवासातील ओलावा कमी होतो, परिणामी उंदीर आणि बेडूक मानवी वस्तीकडे वळतात. त्यांच्या मागावर सापही घरांभोवती येतात.
सापांपासून बचावासाठी काय काळजी घ्याल?
वात्सल्य नेचर क्लब, जळगावचे सदस्य किशोर पाटील, प्रवीण पाटील, गणेश अमृतकर आणि धनंजय अनोस्कर व पंकज सूर्यवंशी त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
- स्वच्छता: घराभोवती कचरा, विटांचे किंवा दगडांचे ढिगारे साचू देऊ नका. ही सापांची लपण्याची हक्काची ठिकाणे असतात.
- गोठ्यातील कामे: जनावरांच्या गोठ्यात चारा हाताळताना किंवा इतर कामे करताना काळजीपूर्वक लक्ष द्या.
- बूट आणि टॉर्च: रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना किंवा शेतात पाणी देताना पायात बूट घाला आणि सोबत टॉर्च (बॅटरी) ठेवा.
- बेडरुमची खबरदारी: जमिनीवर झोपताना मच्छरदाणीचा वापर करा आणि अंथरूण भिंतीपासून थोडे लांब ठेवा.
सर्पदंश झाल्यास काय करावे?
परिसरात आढळणारे सर्वच साप विषारी नसतात. मुख्यत्वे नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि पोवळा हेच विषारी साप आहेत. चुकून सर्पदंश झाल्यास:
- घाबरू नका, रुग्णाला धीर द्या.
- कोणत्याही मांत्रिक किंवा अघोरी उपायांच्या नादी लागू नका.
- तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा.
सापांना मारू नका, तो गुन्हा आहे!
साप शेतकरी मित्र आहे. जर तुमच्या परिसरात साप किंवा कोणताही वन्यजीव दिसला, तर त्याला मारू नका किंवा इजा पोहोचवू नका. असे करणे वन्यजीव अधिनियम कायदा १९७२ अन्वये गुन्हा आहे. साप दिसल्यास तात्काळ स्थानिक सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव रक्षक किशोर पाटील जळगाव



