महाराष्ट्र
लोकमन न्यूज अनिल चौधरी : जून महिना सुरू झाला की पालकांच्या मनात एकच प्रश्न घर करून राहतो — १०वी, १२वीनंतर पुढे काय?
या प्रश्नाच्या शोधात उत्सुकता, धावपळ आणि चिंता या तिन्ही गोष्टी पालकांना सतावतात. अनेकदा मुलाची खरी बौद्धिक क्षमता व मनाचा कल न तपासता पालक अवास्तव अपेक्षा ठेवतात. यामुळे पुढे मुलांवर मानसिक ताण येण्याची, अपयशाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि आवड वेगवेगळी असते. मात्र अनेक पालक आपल्या मुलाला “खूप हुशार” किंवा “कमकुवत” असा शिक्का कोणतीही वैज्ञानिक तपासणी न करता मारतात. प्रत्यक्षात मुलाची बौद्धिक क्षमता न तपासता केलेले असे निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात.
बुद्धिमत्ता ही ईश्वरदत्त देणगी असली तरी तिची अचूक पातळी जाणून घेणे महत्त्वाचे असते. अनेक वेळा मुलांची बौद्धिक क्षमता चांगली असूनही अपेक्षित यश मिळत नाही. यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे असू शकतात. योग्य तपासणी, उपचार व समुपदेशनातून ही कारणे शोधून दूर करता येतात.
मुलांकडून अपेक्षा ठेवताना त्यांची बुद्ध्यांक (IQ) चाचणी करून घेणे आवश्यक आहे. या चाचण्यांमधून मुलाची बौद्धिक क्षमता किती आहे, याचा अंदाज घेता येतो.
साधारणतः:
९१ ते ११० : सर्वसाधारण बुद्धिमत्ता
१११ ते १३० : हुशार व बुद्धिमान
१३१ पेक्षा जास्त : अति बुद्धिमान
८१ ते ९० : शैक्षणिक स्लो लर्नर
८० पेक्षा कमी : मतिमंदत्वाची सुरुवात
या निष्कर्षांनुसार मुलांच्या शिक्षणपद्धतीत बदल करता येतो. त्यामुळे पुढे अपेक्षाभंग, नैराश्य, उदासीनता यांना सामोरे जावे लागत नाही. तसेच आर्थिक व मानसिक नुकसानही टाळता येते.
बुद्ध्यांक चाचणी कोणत्याही वयात घेता येते; मात्र ती प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांकडूनच करून घेणे गरजेचे आहे. चाचणीपूर्वी मुलाची योग्य मानसिक तयारी करणे आणि चाचणीनंतर पालक व मुलांना समुपदेशन देणे तितकेच महत्त्वाचे असते.
याशिवाय, १०वीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम असतो. येथे कल चाचणी (Aptitude Test) महत्त्वाची ठरते. या चाचणीत गणितीय, भौमितिक, भाषिक, वैचारिक, निर्णयक्षमता आदी विविध क्षमतांची तपासणी केली जाते. त्यानुसार संबंधित शिक्षणक्रमासाठी आवश्यक असलेल्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहेत की नाही, हे समजते.
उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा अभियांत्रिकी शाखेत जाण्याची असते; मात्र चाचणीत गणितीय क्षमता कमी आढळल्यास अशा निर्णयाचा पुनर्विचार करता येतो. अर्थात, या चाचण्या अंतिम निर्णय देत नाहीत; त्या केवळ योग्य दिशा दाखवतात. अंतिम निर्णय विद्यार्थी व पालकांनीच घ्यायचा असतो.
अनेकदा मित्र-मैत्रिणींच्या प्रभावामुळे विद्यार्थी विशिष्ट अभ्यासक्रम निवडतात. पुढे यश मिळाले तरी आवड नसल्याने कामाचे समाधान मिळत नाही. आयुष्य निरस होते आणि नैराश्य निर्माण होते.
जर व्यक्तीला आपल्या आवडीचे क्षेत्र मिळाले, तर तो पूर्ण क्षमतेने काम करतो, लवकर प्रगती करतो आणि आयुष्यात सुखी राहतो. त्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक व मनाचा कल यांची तपासणी करणे ही काळाची गरज बनली आहे. शेवटी, प्रगती आणि सुखसमाधानात मनाची भूमिका अत्यंत निर्णायक असते. 

मुलांचा बुद्ध्यांक व कल चाचणी : योग्य शिक्षणदिशेसाठी गरजेचा वैज्ञानिक मार्ग
Anil Chaudhari २१/१/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
