महाराष्ट्र
लोकमन न्यूज़ अनिल चौधरी मुंबई : शाळेत विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी व शिस्त राखण्यासाठी शिक्षकांनी चांगल्या हेतूने केलेली माफक आणि समंजस कारवाई गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा बॉम्बे उच्च न्यायालय यांनी दिला आहे. या निर्णयामुळे शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रात स्पष्ट दिशा मिळाली आहे.
न्यायालयाने आपल्या टिपणीत स्पष्ट केले की, मुलांचा सर्वांगीण विकास केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसतो. शिस्त, सामाजिक मूल्ये, नैतिकता, जबाबदारीची जाणीव आणि समाजात वावरताना आवश्यक असलेली वर्तणूक यांचा विकास तितकाच महत्त्वाचा आहे. हे घडवून आणताना शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून, मार्गदर्शन आणि संस्कार घडविणे हीदेखील त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
न्यायालयाने हेही अधोरेखित केले की, शिक्षकांनी केलेली कारवाई शैक्षणिक शिस्तीच्या चौकटीत, मर्यादित, प्रमाणबद्ध आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी असेल तर तिला गुन्हेगारी स्वरूप देता येणार नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अमानुष वागणूक, शारीरिक छळ किंवा सूडबुद्धीने केलेली कृत्ये समर्थनीय नाहीत, असे स्पष्ट संकेतही न्यायालयाने दिले.
या निर्णयामुळे शाळांमधील शिस्तीच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या संभ्रमाला आळा बसणार असून, शिक्षकांना कायदेशीर भीती न बाळगता विद्यार्थ्यांच्या वर्तन सुधारासाठी आवश्यक ती समंजस पावले उचलण्यास बळ मिळणार आहे. तसेच पालकांनाही शिक्षकांच्या भूमिकेकडे अधिक समजूतदारपणे पाहण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. 

शिस्तीचा हेतू महत्त्वाचा; शिक्षकांची माफक कारवाई गुन्हा ठरत नाही--मुंबई उच्च न्यायालय निकाल
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १४/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
